फलज्येतिष विरोधी मोहीम

चळवळीमध्ये विवेकवाद प्रथम मूर्त स्वरूपात आणण्याचं श्रेय डॉ. कोवूर यांचं आहे. चमत्कार दाखवून बुवाबाजी करणाऱ्या तथाकथित अलौकिक बाबाबुवांना आपला दावा सिद्ध करून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं. १९७२ साली त्यांनी आपला अलौकिकतेचा दावा सिद्ध करून दाखविणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले.

यातील अचुक भविष्यकथनाचा दावा करणाऱ्यासाठीची कसोटी अशी: ज्योतिषींना दहा व्यक्तींच्या हस्तमुद्रा किंवा कुंडल्या त्यांच्या जन्मस्थानाचे अचूक अक्षांश-रेखांश आणि अचुक जन्मवेळ यासकट दिल्या जातील. ज्योतिष्यांनी फक्त दोनच गोष्टी सांगायच्या- १. पत्रिकेतील व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आणि २. ती व्यक्ती जीवंत आहे का नाही. त्यावेळी कोणीही हे आव्हान स्वीकारले नाही. असेच आव्हान अंनिसने पुढे जास्त आकर्षक बनविण्यासाठी एक लाखावरून एकवीस लाखापर्यंत वाढविले आणि माध्यमांद्वारे त्याची खूप जाहिरातही केली. आणि भाकित अचुक असण्याची अटही २० % नी कमी केली. पण आजही कोणीही एवढे सोपे आव्हान स्वीकारण्यास पुढे येत नाही! परंतु यातून निदान लोकांना तरी ज्योतिषशास्त्र किती भ्रामक आहे हे पटू लागलं आहे. उद्याचं जावू द्या; पण आज काय आहे हे सुद्धा ओळखता येवू नये? भारतातील एकाही ज्योतिषपंडिताला आजपर्यंत एकही अचुक भविष्य वर्तविता येवू नये? पैशासाठी नसले तरी निदान स्वतःची इज्जत राखण्यासाठी तरी? साध्या साध्या गोष्टी ओळखण्यासाठी फारसं गहन ज्ञान लागत नाही.

हस्तसामुद्रिक, फलज्योतिषी आणि रोखेबाजार-विश्लेषक यांचे स्फुट विचार: १. रोखेबाजार विश्लेषक-भाकित वर्तवणं हा बुचकळ्यात टाकणारा व्यवसाय आहे. कैक वर्षे मी अशा भाकितांचा अभ्यास करीत आलो आहे; काही वर्षे स्वतःही भाकितं केली आहेत कारण मी इक्विटी रीसर्चर होतो. शेअर बाजारातील चढउतारांचा कंपन्यांच्या कामगिरीशी संदर्भ लावून बाजाराच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. त्या काळच्या स्वतःच्याच लेखांकडे आता जेव्हा मी बघतो तेव्हा त्यामध्ये खऱ्या-खोट्या भविष्य कथनांचं एक कडबोळं मला दिसतं. माझ्या इतर व्यवसाय बंधूंबाबतही असंच चित्र आहे. खरं खोटं काहीही भाकीत करा, पण व्यवसाय चालूच राहतात. मोठ्यामोठ्या कंपन्यांमध्ये असे विश्लेशक लठ्ठ पगार देवून ठेवलेले असतात. गुंतवणूक दारांचे त्यांच्यामुळे खूप नुकसानही होते. पण त्यांना कधी कोणी बडतर्फ करीत नाही की कोर्टामध्ये खेचत नाही. त्यांच्या एम बी ए डिग्रीचा मान राखून या भाकितकारांना हस्तसामुद्रिक आणि फलज्योतिषी यांच्या पंक्तीला बसवायला हवं कारण त्यांच्यात फरक एवढाच असतो की रोखेबाजार विश्लेशकांना बहुराष्ट्रीय कंपन्या लठ्ठ पगार देत असतात आणि फलज्योतिषी आणि हस्तसामुद्रिक यांना असा पगार नसतो. पण भविष्य सांगणाऱ्यांमधलेही काही टीव्ही चॅनलमुळे आणि वर्तमानपत्रांमुळे खूप पसिद्ध झाले आहेत आणि चांगली कमाई पण करतात. मी आणि माझी पत्नी- आमची रास एकच आहे-आम्ही प्रत्येक महिन्याचं आणि सबंध वर्षाचं अगदी सविस्तर भविष्य सांगणारं साहित्य विकत घेत असू. ते अगदी काळजीपूर्वक वाचून मी आपल्या ‘पाम पायलट’ मध्ये त्याची नोंदही करूने ठेवीत असे. म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेलाच संपूर्ण महिना कसा जाणार हे कळून येई. दिल्लीला दिल्या जाणाऱ्या साऱ्या मेजवान्यांमध्ये पनीर असेल की नाही हे जसं अचुक सांगता येईल तसंच आमच्या राशीभविष्याचंही विश्लेषण होतं.

आणि माझी खात्री आहे तुमचंही माझ्यापेक्षा काही वेगळं नसणार. सगळंच भविष्य कथन म्हणजे कचरा असतं असं मी म्हणणार नाही. पण हे काही प्रेशर कुकर किंवा रेफ्रिजरेटर यांच्यासारखं भरवश्याचं जे चालू केलं की हमखास अन्न शिजवेल किंवा थंड करेल असे उत्पादन किंवा सेवा नाही. भविष्य कथन एवढं विश्वास ठेवण्यालायक नसतं हे आपण सर्वच जाणतो. हे सर्व जाणूनही असलं खोट असलेलं उत्पादन मी का विकत घेत राहतो?

डॉ. नारळीकरांचं मत: फलज्योतिष्याला ते शहरी अंशश्रद्धा म्हणतात. अगदी तरूण माणसं सुद्धा त्यावर भरोसा ठेवतात याची त्यांना काळजी वाटते. त्यांच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘सायंटिफिक एज‘ या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करण्याच्या संदर्भात ते म्हणतात, ‘फलज्योतिष्यावर असलेल्या श्रद्धेचं पुन्हा एकदा परीक्षण करायला हवं. केवळ वयस्क लोकच त्यावर विश्वास करतात असे नाही. खूपशा तरूण मुलांचीही फलज्योतिषावर श्रद्धा असते. मला असं वाटतं प्रत्येकाने ते व्यक्तिशः तपासावे आणि मगच विवेकपूर्ण निर्णय घ्यावा.’ डॉ.नरेन्द्र दधिच, आयुकाचे डायरेक्टर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ.नारळीकरांनी आपल्या या पुस्तकाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना गेल्या शतकातील भारतीय विज्ञानाच्या वाटचालीतील शिखरं तसेच खाचखळगे स्पष्ट केले.

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी समाजमनामध्ये परिवर्तन होण्याची किती गरज आहे हे सांगतांना त्यांनी राजा राममोहन रॉय यांनी ह्या बाबतीत बजावलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. सतीची चाल बंद करण्याचा कायदा मंजूर करून घेण्यात राजा राममोहन रॉय यांचा महत्वाचा वाटा होता. आधुनिक विज्ञान शिक्षणात आणण्याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि समाजमानस बदल्याशिवाय प्रगती होवू शकणार नाही हे प्रथम त्यांना उमगले.
पुस्तकाच्या ‘विज्ञान आणि धर्म’ या अखेरच्या प्रकरणावरील प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणतात, ‘ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे आहेत आणि एकाचे दुसऱ्यावर अतिक्रमण होता कामा नये; धर्माने जशी वैज्ञानिक तथ्ये स्वीकारायला हवीत तसेच विज्ञानानेही आपल्याला सर्वच गोष्टींचं आकलन होतं आणि स्पष्टीकरण करता येतं असं नाही हे मान्य करावं. उदा: विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे अजूनही समजलेले नाही. विज्ञानाला हे एक मोठे आव्हान आहे. तेव्हा विज्ञानाने सुद्धा नम्र राहिलंच पाहिजे.’

महा अंनिसने योजलेले उपाय: यूजीसी या संस्थेने सर्व विश्वविद्यालयांना पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पातळीवरील सर्व अभ्यासक्रमांमध्ये फलज्योतिष हा विषय समाविष्ट करण्याविषयी लिहिले आहे. या शंकास्पद शास्त्राला मान्यता प्राप्त करून देण्याच्या ह्या शासनाच्या भगव्या खेळीला अंनिसने जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रातील विश्वविद्यालयांशी संपर्क साधून हा विषय पक्षपात करणारा आणि अधोगतीला नेणारा असल्याने अभ्यासक्रमात समाविष्ट न करण्याचे सुचविले. फलज्योतिष आणि असल्याच इतर बेगडी शास्त्रांचं आणि शास्त्रींचं ढोंग लवकरात लवकर उघडं करणं भाग आहे. सर्व कुलगुरूंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि असले कोणतेही प्रतिगामी अभ्यासक्रम आपल्या विश्वविद्यालयांमध्ये येवू न देण्याचा निर्धार केला. औरंगाबादच्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तर कोर्टाने यूजीसीला हा अभ्यासक्रम कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये सुरू केला जावू नये अशी सूचना देण्यासाठी केस दाखल केली आहे.

फलज्योतिष अभ्यासविषय म्हणून समाविष्ट होता कामा नये यासाठी अंनिसने ठिकठिकाणी व्याख्याने आयोजित केली. आपल्याकडे माहिती तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कित्येक कुशल कर्मचारी असताना आपण या कुचकामी तथाकथित शास्त्राचा पाठपुरावा का करावा? फलज्योतिषाची वाखाणणी का करावी? फलज्योतिष, गूढवाद, अध्यात्मिकता आणि इतर सोंगढोंगांची भूमी अशी आपली प्रतिमा भारताबाहेरच्या जगात झालेली आहे. अशी प्रतिमा धुवून काढण्यासाठी अंनिस फलज्योतिषाच्या खंद्या पुरस्कर्त्यांना सार्वजनिक वादविवादासाठी बोलावीत असते. असे अनेक वादविवाद ठिकठिकाणी झाले आहेत. अशा वादविवादातून श्रोत्यांचे प्रबोधन होवून त्यांना फलज्येतिष्यातील निरर्थकपणा ध्यानात येतो.

अंनिसने काही ठिकाणी या विषयावर बैठकी आणि परिषदा आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये खालील प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आले.
१. महाविद्यालये व विश्वविद्यालयांमधून फलज्योतिष हा विषय अभ्यासला जावू नये.
२. फलज्योतिषावर विश्वास ठेवून अनेकदा नुकसान होत असल्याने ग्राहकसंरक्षण कायदा फलज्योतिषींना लागू करावा.
३. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून फलज्योतिषावरील स्तंभाच्या खाली ‘केवळ करमणुकीसाठी’ अशी टिप्पणी छापणे अनिवार्य करावे.
४. लग्न जुळवतांना वधुवरांच्या पत्रिका पाहिल्या जावू नयेत.
५. दैववादाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.

सोलापूर येथे अखिल भारतीय फलज्योतिषी संमेलन भरले होते. यूजीसीने फलज्योतिष हा विषय समाविष्ट करावा असे सुचविल्यामुळे आपला झालेला विजय साजरा करण्यासाठी हा मेळा भरविला होता. अंनिसने ह्या मेळ्याचा उपयोग ह्या भ्रामक शास्त्राचे पितळ उघडे करण्यासाठी केला. अनेक प्रतिथयश फलज्योतिषींना त्यांनी कमीत कमी आपल्या आधारतत्त्वांचे तरी पुरावे सादर करावेत अशी विनंती करणारी पत्रे अंनिसने लिहिली. आपले वादमुद्दे मांडण्यासाठी कोणी फलज्योतिषी पुढे येत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. कदाचित यावर वाद होवूच शकत नाही असा त्यांचा समज असावा. फलज्योतिषींचे अंदाज सपशेल चुकल्यामुळे ओढवलेल्या आपत्तींबाबत लोकांना सांगण्यासाठी आम्ही एक स्पर्धा ठेवली होती. इतर देशांमध्ये असली भाकिते करणाऱ्यांविरुद्ध काहीतरी कडक कारवाई झाली असती.

विद्यार्थ्यांनी असल्या लोकहितविरोधी कारवायाना विरोध करण्याची आणि फलज्योतिष आणि पत्रिका यांच्यावर विश्वास न ठेवण्याची शपथ घेण्यासाठी ठिकठिकाणी शपथसमारंभ अंनिसने आयोजित केले. यामुळे दैव, यदृच्छा, किंवा योगायोग असल्या भ्रामक गोष्टींवर विश्वास न ठेवता मेहनत करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटेल अशी अपेक्षा होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना पुढे येवून या भ्रामक शास्त्रांविरुद्ध त्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी त्यांना अंनिसने विनंती केली आहे. आपल्या महत्त्वाच्या मानवी मूल्यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या या भ्रामक शास्त्राचा निशेध एका संयुक्त विधानाद्वारे अंनिस आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी मिळून करायला हवा.