वैज्ञानिक मनोवृत्ती

विज्ञान हेच असं एकमेव अस्त्र आहे जे आपल्या इथल्या भूक आणि दारिद्र्य, अस्वच्छता आणि निरक्षरता, अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरा, वाया जाणारी प्रचंड साधनसंपत्ती आणि या समृद्ध देशातील उपासमार अशा सर्व समस्यांवर तोडगा काढू शकेल. आजच्या जगामध्ये विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं कोणाला शक्य होईल? प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानाची मदत आपल्याला घ्यावी लागते. यापुढे विज्ञानाला आणि विज्ञानाच्या मित्रांनाच केवळ भविष्य आहे. – जवाहरलाल नेहरू

देशाचे पहिले द्रष्टे पंतप्रधान, नेहरू यांच्या या संस्मरणीय उक्तीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी आजही ह्या सात लाख खेडी आणि पाडे असलेल्या समृद्ध देशामध्ये हरितक्रांतीमुळे प्रत्यक्ष भूकबळी नसले तरी, ज्यांच्या गळ्याभोवती अंधश्रद्धा आणि जीवघेण्या परंपरा-रूढींचे दोरखंड आवळलेले आहेत अशाच लोकांची वस्ती जास्त आहे. हे दोरखंड तोडून टाकल्याशिवाय नेहरूजींचं विज्ञानाशी मैत्री करण्याचं स्वप्न साकार होणार नाही तर विज्ञान केवळ काही अभिजनांच्या हातातलं खेळणं आणि शोषणाचं साधन बनून राहील.

समाजामध्ये वैज्ञानिक चित्तवृत्ती जोपासणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारापेक्षा बरंच काही जास्त आहे: वैज्ञानिक चित्तवृत्ती (सायंटिफिक टेंपर) म्हणजे केवळ ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक असलेली माहिती आणि तथ्ये जाणणं नव्हे किंवा विवेकबुद्धी वाढवणारा विवेकवादही नव्हे. त्यामध्ये बरंच आणखी काही आहे. वैज्ञानिक चित्तवृत्ती हा एक मनाचा कल आहे ज्याच्यामुळे व्यक्तीचा एक विशिष्ट दृष्टिकोन आणि वागणुकीची पद्धत निश्चित होते. असा कल एखाद्या वंश-धर्म-देशापुरता मर्यादित नसून तो वैश्विक आहे. हा कल एक प्रभावी नैतिक मूल्य म्हणून आपल्या समाजाच्या सर्व थरांमधून झिरपला आणि मुरला पाहिजे; कारण आपण कसा विचार करतो, आपल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक समस्यांना कसे सामोरे जातो या सर्व प्रक्रियांवर वैज्ञानिक चित्तवृत्तीचा मोठा प्रभाव पडतो.

वैज्ञानिक चित्तवृत्तीमध्ये मान्य केलेल्या आधारविधानांपैकी महत्त्वाची विधाने अशी (प्रमिसेस) आहेत:
* विज्ञानाची पद्धती ही ज्ञानसंपादनाची एक विश्वासार्ह पद्धती आहे.
* या पद्धतीनुसार मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक मानवी समस्यांचं आकलन आणि उकल करता येते.
* वैज्ञानिक पद्धती माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि नैतिकता ते राजकारण आणि अर्थकारण या सर्व क्षेत्रातील मानवी प्रयत्नांमध्ये पूर्णपणे उपयोगात आणली गेली पाहिजे तरच मनुष्य जातीचा निभाव लागेल; या भूतलावर मानव टिकू शकेल.
* वैज्ञानिक पद्धतीद्वारा संपादन केलेले ज्ञान हे त्या वेळेस माहीत असलेल्या सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जावू शकते हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. ह्या ज्ञानाशी विसंगत असलेल्या ज्ञानाबाबत शंका उपस्थित केली पाहिजे तसेच तत्कालीन ज्ञानाचे पुन्हा पुन्हा परीक्षण करीत राहिले पाहिजे.

वैज्ञानिक पद्धती म्हणजे माहिती गोळा करून, त्यावर प्रक्रिया करणे; त्यातून मानवी स्वभाव, मानवाचे नैसर्गिक आणि सामाजिक वातावरण यांचं सुव्यवस्थित आकलन होईल असे अर्थपूर्ण आकृतीबंध (पॅटर्न्स) शोधणे. अशी ही पुनर्जननात्मक (रीजनरेटिव्ह) प्रक्रिया आहे. या अर्थाने संक्रामक (कम्यूनिकेबल) मानवी ज्ञानाचे सर्व पैलू वैज्ञानिक पद्धतीच्या कवेत येतात आणि भौतिक विज्ञान, सामाजिक विज्ञान, उपयोजित विज्ञान अशा तऱ्हेचे विज्ञानाचे कृत्रिम कोष्ठीकरण (कंपार्टमेन्टलायझेशन) ज्ञानसंपादनाच्या आड येवू शकत नाही.

हे सर्व ध्यानात घेवून अंनिस वैज्ञानिक प्रवृत्तीचा विशेषतः ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवते. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती रुजविणं आणि जोपासणं हे अंनिसचे स्वप्न आहे.